हळवे कधीच नव्हते..(गजल)

| |

हळवे कधीच नव्हते,आभाळ हे मवाली..
झाले असेल त्याचे अलवार दुख अकाली..!!

घनगर्द सावलीशी नाते कधीच नव्हते..
फिरलो उन्हात तेव्हा ओळख जुळून आली..!!

पोटात भूक आणिक म्हणतो नको नको मी,
मुल्ये जगावयाची गरिबीतही कळाली..!!

बुद्धीबळातले मी नाही मुळीच प्यादे..
बांधून ठेवलेल्या आधीच ज्यास चाली..!! 

डोळ्यातले नको तू,टाकू पुन्हा तरल मिठ..
भाजी समन्वयाची खारट बरीच झाली..!! 

अडवू नको पिकांचे तू एवढ्यात पाणी..
त्यांची 'तहान' देवा आहे तुझ्या हवाली..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर ..
9975767537

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर...

| |

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर..
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर..!! 

सोपे नसते.कळले..!आयुष्याचे चंदन होणे..
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर..!!

येता-जाता 'तो' डोकावत असतो  विहिरीपाशी..
'भरल्या' विहिरीतुन नक्की जगण्याचा मिळतो मंतर..!!

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची..
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर..!!

कृष्णाला पाहुन त्या पुतनेलाही फुटला पान्हा..
मग का आजमितीच्या कैक यशोदांचे स्थित्यंतर..??

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा...
9975767537

हा देहाचा सुर्य कलू दे..(गजल)

| |

हा देहाचा सुर्य कलू दे..
आयुष्याची सांज ढळू दे..!!

इतके प्रेमळ बनव मला की ..
मी मेल्यावर दुःख रडू दे...!!

हळहळणार्या तुळशीलाही..
मुसमुसते अंगण समजू दे ..!!

काच मनाची कणखर व्हावी..
ओरखडेही 'नरम' पडू दे..!!

हट्ट मुलाचे पुरवत असता...
'माझे बाबा' परत कळू दे..!!

दे सुख नावाचे तणनाशक ..
बहर मिळू दे दुःख जळू दे..!!

-गणेश शिंदे..!!

फिनिक्स..(कविता)

| |

शब्द फुलतांत अन
वाटा अडतातं ...
नकोनकोशी कारणे
येवुन भिडतातं..
खुप वाटतं मनांतून
आकाशाला गवसणी घालावी...
पण आयत्या वेळी ना
बघ कसे पंख तुटतात..
मी खरंच.. फिनिक्स नाहीये..
राखेतुनही वर यायला..
मग काय??
बापडे शब्द,तीच राख
अंगावर घेऊन,आयुष्य कंठतात!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा..
9975767537

अनवाणी पावलांनी(मराठी कविता)

| |

अनवाणी पावलांनी एकदा
टाकावचं ऎखांद पाऊल
कळायला हवी कधीतरी
काट्याकुपाट्यांची चाहुल
अनवाणी पावलांनी कधी
निखार्यावरही चालुन पहावं
हे ही नाही पटलं तर
स्वैर पाण्याबरोबर वहावं
अनवाणी पावलांनी मग
जिंकावी आकाश नी धरती
मरणालाही जिंकून मग
खुशाल जावं वरती....!!

-गणेश शिंदे..
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

सहजचं..

| |

आपल्याला ते आवडावेतं
ज्यांना आपण आवडतो...
नाहीतर निरर्थक गोष्टींसाठी,
आपण व्यर्थ आयुष्य दवडतो.
भावनांच्या भरात ऊगाच
हातंच सोडायला बघतो
अन पळणांर निसटून गेलं की,
परत हातंच्या मागं निघतो...
आयुष्य नेहमींच सुंदर होतं...सुंदर आहे..
थोडंस अॅडजस्ट केलं ना.. की,
खुशियो का समंदर आहे!!!

-गणेश शिंदे, दुसरबिडकर©®
9975767537

प्रश्न (मराठी कविता)

| |

मी फिरतोय..गरागरा..
एखाद्या सिलिंग फॅन सारखा..
पण अजुनही..हवं ते उत्तर मिळतं नाही...
..अन मिळणारही नाही..कदाचीत..
उत्तराची अपेक्षा तरी कोणाकडुुन???
अर्थात..माझ्याकडूनंच!
ज्याचा प्रश्न,त्याला उत्तर माहीत असतं....अस
म्हणतात.
..पण मात्र सगळ्याच वेळी नाही...
माझा नुसता प्रश्नचं जन्माला आला...
तो उत्तर घेऊन आलाचं नाही..
मग..,त्या अपेक्षीत उत्तराची कुठवरं वाट पहायची??
कधी?का?कुठवरं?आजन्म?
की मरेपर्यन्त?
की सगळे भोग सरल्यावर??
सगळे नुसते,प्रश्न अन प्रश्न..
विनाउत्तरांचे..
मनाच्या भासाचे की विरोधाभासाचे???
उत्तर मिळण्यात काय साध्य होईल?? माहीत नाही...
कदाचीत..काहीच नाही...
का?असं होवु शकत नाही का??
की,प्रश्नकर्ताचं प्रश्नासहीत ..संपून गेला तर??
ते सगळे प्रश्नचं नाही तर....
( उत्तराची अपेक्षा करण्याचा 'प्रश्नचं नाही...)

-गणेश शिंदे...
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

सल..(मराठी कविता)

| |

नाही पुनवेचा चांदवा..निदान..
सुखाच्या चांदणीनं तरी...
आयुष्याजवळ सरकावं....
नाही सुर्याचा लख्ख प्रकाश..निदान..
एखाद्या काजव्यानं तरी..
जरासं जवळून फिरकावं....!!
संदर्भ बदलत जावे..पण..
आशय नेमका तोच रहावा..
कायदे अन वायदे..बदलावेत..आयुष्याचे..
पण..निश्चय नेमका तोच रहावा..!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

रोज... (कविता)

| |

रोज कितितरी माणसं भेटतात..
काही चांगली..काही वाईट..
काही दोहोंचा सुवर्णमध्य...
काही क्षितिज फाडून..
आभाळ कवेत घेणारी...
काही काळीज फाडून..
आबाळ करणारी...
काही ओळख नसतांना..
ओंजळी भरभरुन रिती करणारी...
काही ओळखीचा फायदा घेऊन..
त्यांची झोळीआपल्या ओंजळीनं भरणारी...
हम्म...असो...!!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

पुन्हा एकवार..(कविता)

| |

पुन्हा एकवार...
*********
पुन्हा एकवार.....
मेंदीभरले हात हातात आले
अर्धोन्मिलीत नयनांचे देणेघेणे झाले
निळ्या आभाळाला फिरुन एकवार
धरतीचे अनामिक देने मिळाले
************
पुन्हा एकवार....
पैंजणांचा नाद स्थिरावला
श्वासभरला देह थरथरला
अधोरेखित स्वप्नात पुन्हा
हवाहवासा गुलाबी रंग भरला
**************
पुन्हा एकवार.....
आयुष्यातला चंद्र सजला
अंगातला विरहाचा दाह विझला
मोकळ्या आभाळातला पाऊसही
स्वतच्या थेंबात पुन्हा भिजला
************
पुन्हा एकवार.....
'तू' अलगद आयुष्यात आली
हिरवी गाणी पुन्हा फुलली
तुझी साथ झाली..म्हणुनचं
रातरानी पुन्हा बहरली
**************
पुन्हा एकवार.....
मी माझा राहिलो नाही
हरलो नाही..हरवलो नाही
तू सोबत आहे,म्हणुनचं
चालत राहीलो,थांबलो नाही.
***************
-गणेश शिन्दे®
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

साॅक्रेटीस..(मराठी मुक्तछंद काव्य)

| |

मी स्वाभिमान पाजळतं
बहिर्यांच्या देशात
माझं...नशिब आजमावतोय..
मी..थोडासां जळतं..थोडा उजळतं..
अंधारभरल्य डोहात,
माझं एकटेपण सजवतोयं.!!

सकाळी अंधार झटकून अंगावरचा
ते..पुन्हा अंधार अंगावर घेइपर्यंत!
एक-एक वेडा जेव्हा समोर येतो
तेव्हा माझ्यातला साॅक्रेटिस जागा होतो..

अन..हाय..तेव्हाच समोरचा वेडा मला
माझ्यादेखतं मला वेडा बनवुन जातो..
हे तसं रोजचचं आहे....दोनचं कपडे...
आलटून पालटून घातल्यासारंख..
मनाला कधी चांगल तर....
कधी वाईट वाटल्यासारखं!!

खरंच.....कंटाळलोय आता..
गड्या आपला गाव बरा...
तिथली लोक,वेडा बनवत असली तरी...
त्यांचा स्वाभिमान पाजळतांना..
आपल्या स्वाभिमानाचं भान ठेवतात...
सुख नाही निदान दुःख तर वाटतांत...
माणुस म्हणुन रोज रोज नाही..
पण कधी कधी तर भेटतात ना??????

-गणेश शिंदे,दुसरबिडकर
9975767537

शस्त्रसंधीचा कशाला??(गजल)

| |

पाहुनी जालिम विषारी माणसाची जात साली..
दंश करणे सोडुनी तो नागही करतो दलाली...!!

शस्त्रसंधीचा कशाला तू उगा धरतेस हेका..
जीवघेणे तीर आधी टाक डोळ्यातून खाली..!!

यार श्वासांची उधारी वाढली भरपूर आता..
अन किराणा जीवनाचा संपण्या सुरुवात झाली..!!

दाखले प्रेमातले मागू नको मजला सखे तू..
कागदे चुरगाळण्याचा नाद मज आहे मवाली..!!

केवढा होतो सुखाचा पाहुण्यासम सोहळा तो..
मग दुखाच्या का शिरावर वांझ असण्याची हमाली?? 

ह्याच गावावर किती रुसला कसा हा पावसाळा.. 
अन हवेने आणली नाही कधी साधी खुशाली..!!

सोडले रागावणे तेव्हा तुझ्यावर जीवना मी..
यार अगतिकता तुझी मृत्यूपुढे जेव्हा कळाली..!!

-गणेश उत्तमराव शिंदे...
दुसरबिड,बुलडाणा..
९९७५७६७५३७

कोठुनी शिकले असे हे विस्तवाने..(गजल)

| |


कोठुनी शिकलेअसे हेे विस्तवाने
आतल्या आतून जळते म पहाणे?

ताठ मानेने जरा जगण्यास गेलो,
मोडले मज 'ताठ' पाहूनी जगाने..!!

गंध आयुष्या तुझा कळल्यावरी मग,
सोडला हेका कसा बघ अत्तराने..!!

प्रेम नुसते वाटण्याची गोष्ट नाही..
जाणले तर स्वर्ग आहे,बघ मनाने..!!

वायदा दुःखासवे कुठलाच नाही..,
पण तरी हा सोबती असतो सुखाने..!!

भावनाही स्वस्त झाल्या फार आता
माणसांनी काढले बघ कारखाने..!!

दूर गेली फार तू कुठल्या कलेने? 
तोडणे अवघड मला अंतर शहाणे..!!

श्री 'गणेशा' तोच माझ्या जिंदगीचा,
घेतला बघ श्वास जेव्हा काळजाने..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

देहास जाळण्याला मीही अधीर नाही(गजल)

| |

अग्नीस जोर यावा ऎसा समीर नाही...
देहास जाळण्याला,मी ही अधीर नाही.!!

आता तरी कळू दे,इजहार काळजाचे..
इन्कार ऎकण्याचा,कानास धीर नाही..!!

माझे मलाच कोडे,श्रावण कसा छळेना..
आता कळून आले,डोळ्यात नीर नाही..!!

दैवास दोष नाही,असलो जरी उपाशी..
ग्रीष्मातल्या झळांचे,कारण शिशीर नाही..!!

प्रेमात मी झुरावे,वाटे जरी मनाला.
पण कुंडलीत त्याने,लिहिलीच हीर नाही..!!

रचल्यात कैक गझला,कोणास याद नाही.  
नंतर कळून आले,मी फैझ-मीर नाही..!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

हे असे आभासवाणे(तरही गजल)

| |

तरही गझल
आदरणीय गजलकारा संगिताताई जोशी यांचा मिसरा
''हे असे आभासवाणे चांदणे आता नको..''
---------------------------------------
स्पंदनांची रेशमी तारांगणे आता नको..
(हे असे आभासवाणे चांदणे आता नको..!! )

साजरा कैफात करुया मीलनाचा सोहळा..
पण तुझे 'येते..!' असे ते सांगणे आता नको..!!

घे मना,आकार आता वर्तुळाचा तू जरा..
भावनांचे 'कोपर्याशी' भांडणे आता नको..!!

वादळाचे नेहमी येणे सुरू असतेच ना..?
त्यामुळे तर आणखी घर बांधणे आता नको..!!

श्वास कणसांना मिळो तू एवढे नक्की वहा.. 
उंच ताटांचे भुईवर रांगणे आता नको..!! 

एवढे तारूण्य गेले शोधण्या दैवास ह्या..
मान हलतांना तयाचे पांगणे आता नको..!!

रोज नयनी पावसाळा,हा उन्हाळा आणतो...
फार झाले या ऋतुंना सांधणे आता नको..!!

-गणेश शिंदे,
दुसरबिड,बुलडाणा..
9975767537

बाप नावाचे उडाले(गजल)

| |

बाप नावाचे उडाले मोसमी वार्यात छप्पर...
माय नावाचा किती मग सांडला पाऊस घरभर..!! 

केवढा जीवात तेव्हा जीव येतो काय सांगू..
तो कपाशीचा  दिसावा वाढतांना कोंब झरझर..!!

पावसा छळवाद का हा मांडतो तू माणसांचा..?
यायचे तर येत नाही,जात नाही जायचे तर..!!

रात्रभर बाहेर मी आलोच नाही हाय! दैवा..
अन सकाळी चांदणे संपून गेले यार तोवर..!!

संपुदे 'वनवास' देवा एकदा हा प्राक्तनाचा..
मग हवे तर 'राज्य'ही नाकारतो बघ मीच सत्वर..!!

झोप डोळ्यातील आता जाणवू दे ना जराशी..
जायचे आहे सकाळी 'नीज रात्री' तूच लवकर..!!

फार झाल्या आजवर चोर्या उगाचच ह्या कफल्लक...
भरजरी चोरी करू बघ काळजाची एक स्थावर..!!

-गणेश शिंदे...
-दुसरबिड,बुलडाणा..
-9975767537

शिवारगाथा (गझल)

| |

पाऊसलेखणीने जमिनीत काव्य कसतो...
कवितेत जिंदगीच्या तो एकरूप दिसतो..!! 

म्हणतात कैक आधी जोडी खिलार होती..
आता खुटा रिकामा दारी उदास हसतो..!!

सत्कार सोहळ्याला ज्याच्याकडून शाली..
बांधावरी बिचारा तो बोडखाच असतो..!!

नुसताच आसवांचा अंदाज बांधल्याने,
रोपास भावनेच्या बघ कोंब येत नसतो..!!

इतक्या सुरेल ताना घेऊ नकोस दुःखा..
हकनाक वेदनांचा येथे जमाव बसतो..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर
9975767537

काव्याग्रह:एक वसा कवितेचा..!! (रसग्रहण)

| |

'ओल्या दुखर्या जखमा जाळणारी
तू गुणकारी मलम आहेस..!
कल्पनेच्या कल्पवृक्षावर कवीनं
बांधलेलं गंधवेड्या चंदनाच
कविते..तू कलम आहेस...!!.. '
विष्णू जोशी संपादीत 'काव्याग्रह'चा ७ वा अंक अर्थात वृक्ष, ह्याच नितळ नि तरल भावनेने रसिकांच्या हाती पडतो..अन मनाचा ठाव कधी घेतो,कळतंही नाही..!!
सहा जाणकार समिक्षकांच्या नजरेतून भावलेले कवी,त्यांच्याशी नकळतपणे होणारी ओळख, तिन सुंदर काव्यात्म लेखांचा काळजापुढे पेश होणारा नजराणा,स्वतःची 'वेगळी ओळख' पटवून देणारे तीन कवी,वसंताने सर्व सृष्टीला आपल्यातला बहर प्रदान करावा तसे स्वतःच्या लेखणीतून फुललेल्या १६ कविंचा 'वसंतोत्सव'..आणि इतक्या सार्या गोष्टी आपल्या हाती देवून तृषार्त झालेले संपादक नि त्यांच 'शाईचे गणगोत'...!!
'काव्याग्रह'चा सातवा अंक अस्सल कविर्हद्यासाठी खुप दौलत घेवून आलेला आहे..!
ह्या 'वृक्षा'चं कुठलही 'पान' वाचायला घ्या मनातली कविता तिथूकच उमलायला सुरुवात होते.मुखपृष्ठापासून सुरु केलं तर प्रशांत असनारे ह्यांची 'कोळी आणि कविता' 'वाह' म्हटल्याशिवाय पुढे जावू देत नाही.
विरधवल परब यांच्या लेखणीतून उषा परब ह्यांच्या 'तिच्या आभाळालातील' स्त्रीवादी कविता काळजाला भिडतं राहतात.पुरुष म्हणून कुठेतरी खोल विचार करायला लावतात.पी.विठ्ठल,शशिकांत हिंगोणेकर ह्यांच्या एकून ४+८ कवितांचा खजाना 'काव्याग्रह' आपल्यापर्यन्त 'पोचवतो'. पी.विठ्ठल ह्यांच्या 'किंवा कल्पना करा की आपण..' 'इतिहास' किंवा 'श्रद्धांजलीचे मौन पाळतांना' ह्या कविता वाचता वाचता माणसाला अंतरमुख करतात. शशिकांतजी हिंगोणेकरांच्या कविताविषयी काय बोलावं??वाचल्यानंतर निश्चितच त्यांच्या कविताच आपल्यासोबत संवाद साधतात.
'गंध शिवाराचा' सदरात ज्येष्ठ साहित्यिक बाबारावजी मुसळे ह्यांनी आजच्या पिढीचे कवी,अनुवादक पृथ्वीराज तौर ह्यांच्या 'गाव आणि शहराच्या मधोमध' चे केलेले रसग्रहण हे कदाचित संग्रहाचं विशेष असावं.काळीज कुरतडत,मन अस्वस्थ करतांना नव्या आशेच्या अभ्युदयाची स्वप्ने दाखवणार्या पृथ्वीराजजींच्या कविता आपल्याही मनाला प्रश्न करतात की 'आपण नेमके कुठले??'
नागराज मंजुळे हे एक चांगले कविदेखिल आहे,ही ओळख मला 'काव्याग्रह'तूनचं झाली.त्यांच्या 'उन्हाच्या कटाविरुद्ध'  ह्या पुस्तकातल्या कवितांशी मनोज मुनेश्वर ह्यांनी करुन दिलेली ओळख न विसरण्याजोगीचं...! वाशिमच्या भुमीतले कवी दिपक ढोले यांच्या 'चेहरे ओरबाडलेल्या देशात' या पुस्तकाचं,ज्येष्ठ साहित्यिक.सदानंदजी  सिनगारे ह्यांच्या खास शैलीतलं समिक्षणही वाचनीय झालेले आहे.
'दिपु' च्या अनघड तितक्याच आशयसंपन्न कवितांचा रणधीर शिंदे ह्यांच्या 'दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता' ह्या पुस्तकाचा रविकांत शिंदे ह्यांनी घेतलेला आढावा,'रक्तसेतू' ,'अग्निशाळा' इत्यादी पुस्तकांच्या गाठीभेटी,राज मेहर यांचा 'पत्थरातल्या काळीजकळा' सगळं सगळं अगदी वाचनाची भूक भागविणारे आहे.
यावेळच्या 'काव्याग्रह'तून मोहन शिरसाठ,रमजान मुल्ला,विनय दांदळे,संदीप काळे,इरफान शेख,अभिषेक उदावंत,फुला बागुल,वीरा राठोड,विनोद मोरांडे,रविंद्र देवरे,नजीम खान,मेघराज मेश्राम,लवकुमार मुळे इत्यादी कविंच्या कविता भेटायला येतात अन मनात मुक्काम करून राहतात..!!
विष्णू जोशी,त्यांचे कविमित्रमंडळ,आणि पाठबळ देणारे कैक हात ह्यांच्यासारख्या कवितेला वाहून घेतलेल्या माणसांमुळेच कविता आणि काव्याग्रह मनोमनी फुलत आहे.व तो निरंतर फुलतं राहणार आहे.अंक एकदा वाचून भूक भागत नाही,पुन्हापुन्हा उघडून वाचावासा वाटणे हेच काव्याग्रह चं खर यश आहे..!!
प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा इतकं अंकाच वेगळेपण ठळक आहे.जास्तीत जास्त कविता रसिकांनी,कवितेचं हे रोपटं आभाळापार नेण्यासाठी अंकाचे नियमित वर्गणीदार व्हावे,आर्थिक मदतीसाठी आपल्या जवळपासच्या जास्तीत जास्त जाहिराती देण्याचा प्रयत्न करावा.कारण उपाशीपोटी कुठलंही युद्ध जिंकल्या जात नसतं..आणि कवितेचा वसा स्विकारायचा म्हटल्यावर आर्थिक प्रश्नही असतातच.त्यांनाही तत्परतेने सोडवणे क्रमप्राप्त असतेच..तुमच्या आमच्यासारख्याच्या खारीच्या वाट्याने हा अंक पुढेही दर्जेदार होईल,ह्यात शंका नाही..!
विष्णु जोशी ह्यांचा हा कवितेच्या अश्वमेधवारू चौखूर पसरू देत..त्याला रसिक मायबापांच उदंड पाठबळ मिळू देत..!!
मनपुर्वक शुभेच्छा..!!

काव्याग्रह
संपादक विष्णू जोशी,
डाॅ.घुनागे हाॅस्पिटलमागे,
मुख्य पोस्ट ऒफिससमोर,
वाशिम,ता.जि.वाशिम-४४४५०५
मो.९६२३१९३४८०,९८६०२२१८४२

-गणेश उत्तमराव शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
९९७५७६७५३७


तू गेल्यावर..(गझल)

| |

तू गेल्यावर पक्के घर नुसते कोसळते..
आधाराला कोणी नसले की मन छळते..!!

राहू दे ना हात घडीभर स्वप्नांभवती..
'अंगण झाडायाचे आहे' मजला कळते..!!

वापरतो तू कुठले अत्तर सांगत जा रे..
धरतीवर तू कोसळतांना जग दरवळते..!!

मी नसले की वार्यावरती लक्ष असू दे..
आठवणींच्या पानोपानी मी सळसळते..!!

बांधावरचे सुकले होते झाड जरासे..
त्याला कळले जमिनीमधले दुःख तरळते..!!

प्रत्येकाचे 'घर कौलारू' सुंदर नसते..
अंदर गेल्यावर कळते,छप्परही गळते..!!

आयुष्याची भाकर साला चन्द्र नसावा..
ते तर नक्की सुर्याइतके सत्य उजळते..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर...

माझ्या मनातले घर कोंदट... (मात्रावृत्त गझल)

| |

माझ्या मनातले घर कोंदट...
अन तू अख्खे घर धडधाकट...!!

तुझ्या प्रितीचे औषध व्हावे...
मरणावरी उतारा दसपट..!!

मौन तुझे मज बोलत असते..
व्यर्थ कशाला आदळआपट..!!

वसतिगृहावर मला सोडुनी..
हळवा होतो 'बाबा' तापट..!!

सुगी संपली स्वप्नांमधली..
मागे आठवणींचे धसकट..!!

असे जगू की तसे जगू मी...
आयुष्याची नुसती फरफट..!!

विहिर मनाची भरली नाही..
यंदा झाला पाउस हलकट..!!

डोळ्यामधले कळते तुजला..
उगीच का तू म्हटली...'चावट.'.!!

सुखाचीच पडझड झाल्यावर..
डागडुजी दुख करते दणकट...!!

तुझ्या पिकाचा बहर 'गणेशा'....
जाळत जावो सारे तणकट..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
९९७५७६७५३७

हरवला आहे...(मुक्तछंद)

| |

गावं तसं खुप वाढलयं......
नवे रस्ते..नव्या ईमारती
नवेचं लोक...नवी वस्ती
म्हणतात...पलिकडच्या अंगाला
कोण राहतं..कळतही नाही
कुणाच्या सुखदुखाला कुणी
फारसं कधी पळतंही नाही
इतकं वाढलयं गावं.........

तोळाभर सुख...(ग्रामिण कथा)

| |

महादानं हिरीत डोकावून
बगितलं.,हिरीला आसलेल्या बारकुल्या नळाचा निस्ता लेकरू
मुतल्यावानी चुळूचुळू आवाज येत व्हता..!!मोटारी
चा फुटबालबी झाकणार न्हायी इतकुस
पाणी व्हतं..!!त्येच्यावर गणगण
मव्हळाच्या माशा,किटकुल,आन
वरच्या जांबाच्या झाडाचा सम्दा पालापाचुळा तरंगत
व्हता..!!हिरीच्या भिताडातून

भोर.. (हिंदी कविता)

| |

भोर...
(उन सभी माताओ को समर्पित जिन्होने इस बंजर मन
की भुमी में संस्कारो के बिज बोये थे..)
कल की भोर आज मुँह फेरे हुऎं है...
उजालो में भी अंधेरो के सांये मिले हुऎ है..!!
कल तक कान्हा के मुरली के स्वर..
कल तक मिरा की मधुर आलाप...
कल तक कबिरदास के दोहे... और..,

मला का दिले तू तिचे भास देवा..(गझल)

| |

मला का दिले तू तिचे भास देवा..?
मनाला उगा ही खुळी आस देवा..!!
मला दे किती ही कठिण जिंदगानी,
जरा भरवश्याचे असो श्वास देवा...!!
तुझ्या रोज ताटात नैवेद्य दिसतो..
कुठे मात्र मुश्किल कसा घास देवा..?
उरातुन हवा जोवरी खेळते ही..  
शिडाला कळो वादळी त्रास देवा..!!

हरवलेली कविता.. (कथा)

| |

एकदा...दोनदा..तिनदा त्यानं डोअरबेल वाजवली,पण आतून कसलीही चाहूल नाही..!तो वैतागला..''झोपली असेल महाराणी,साडेसात वाजताच..तरी म्हणतं होतो,आईला चार-आठ दिवस आणावं....पण सालं ह्या ऒफीसच्या कामानं सगळा घोळ घातला..!!' असं मनातल्या मनात पुटपुटत,तणतणत,आपला पुरुषी अहंकार थोडासा बाजुला ठेवत त्यानं खांद्यावरच्या बॅगमधून त्याची चावी काढली व दरवाजा उघडला.रागाने लाल झालेले डोळे तिचाच शोध घेत होते..

याद आहे..(गझल)

| |

यार नाही,प्यार नाही,फक्त झुरणे याद आहे..
तेच भागाकार आणिक शून्य उरणे याद आहे..!
कैकवेळा गायलो अन कैकवेळा ऎकले पण..
खास गाणी मैफलीची तीच स्फुरणे याद आहे..!
जिंदगीच्या फोडणीला भावनांचा जाळ आणिक..
वेदनेच्या लोणच्याचे मस्त मुरणे याद आहे..!
जीवघेण्या होत आहे रोजच्या त्या वंचना अन,
वल्गनेच्या ह्या शवाला फक्त पुरणे याद आहे..!

एवढीही खास नाही जिंदगानी (गझल)

| |

एवढी ही खास नाही जिंदगानी...
पण गळ्याला फास नाही जिंदगानी.!!
आकडेमोडीत नसतो खेळ सारा..
भूमितीचा तास नाही जिंदगानी..!! 
वाढता वय जाणले मर्मास मी ह्या..
सोडलेले श्वास नाही जिंदगानी..!!
रोज आभाळात मी कुठवर बघावे..?
चांदण्यांची रास नाही जिंदगानी..!!

मन कसे...तसे तसे..!!

| |

ओघळते खारे पाणी
गालाहुनी भलत्या क्षणी
आठवते असं कुणी
मनोमनी याद सुनी
नसलेले भास होती
दिसराती खास किती
रुसलेले श्वास देती
रिती रिती आस हाती
आज नसे तुझे हसे
मन दिसे वेडेपिसे
तुझे भासे जाणे असे
मन कसे....तसे तसे....!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

पळपुट्या जखमा किती.. (मतलाबंद गझल)

| |

पळपुट्या जखमा किती मी सोसल्या देहावरी..
फक्त आहे ही इमानी काळजामधली खरी..!!

मानते मी धन्यता मज भेटला गजरा जरी..
मग कशाला चंद्र-तारे बोलशी काहीतरी..!!

लाजल्या नाही कधी जमिनीवरी येण्या सरी..?
ईश्वरा,काही फुले केलीस पण तू लाजरी.. !!

आपली आपण जरा राखून ठेवा पायरी..
नामयाच्या सारखी भेटेल नक्की पंढरी..!!

ऎनवेळी पावसा नाही बरी ही मस्करी... 
एकदा तू हो धरा, बघ काय जळते अंतरी..!!

कैकवेळा पार केली संकटांची मी दरी...
सांग मज नेशील ना आता सुखाच्या त्या घरी..?? 

सावलीसाठीच करतो मी उन्हाची चाकरी..
ईश्वरा सांभाळ माझी लेकुरे अन भाकरी..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

जय महाराष्ट्र (अभंग)

| |

धन्य महाराष्ट्र
धन्य कामगार
अजुनी बेजार
राज्य सारे... !!

सुराज्या चा ठेवा
शिवबाने दिला
सांभाळ जमेना
आम्हालाही..!!

संपलाच नाही
बिगारीचा काळ
नांगराचा फाळ
खांद्यावरी..!!

वैश्विक जाहले
'मालका'चे सुख
कामगार दुःख
तैसेची बा..!!

अजुनही हाल
कामगारा घरी
अजुनही दरी
संपेचना..!!

फुलावा फळावा
महाराष्ट्र सारा
शिवबाचा होरा
समजावा..!!

माणसा माणुस
ओळखता यावा
भेदाभेद व्हावा
तडिपार...!! 

आजच्या दिवशी
मागणेही हेच
काळजांचे पेच
दुर व्हावे..!!

जय महाराष्ट्र
जय शिवराय
कष्टकरी पाय
पुज्य व्हावे..!!

तमाम मित्रपरिवाराला महाराष्ट्र दिन,कामगार दिन आणि छत्रपती शिवराय जयंतीच्या शुभेच्छा..!!
॥जय महाराष्ट्र॥जय शिवराय॥जय कामगार॥

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

उपवास..(विनोदी)

| |

उपवास म्हटला की लगेचच पुलं आठवतात..हो पण माझा उपवास
पुलं च्या आसपास ही फिरकू शकत नाही.कुठे 'आयफेल'वरचे
पुलं आणि कुठं 'टिनशेड'मधला मी..असो ..पुलंच्या उपवासाच
कारण वेगळं होतं,माझा मात्र कारणांचा उपवास आहे..पुलं असते
तर त्यांच्यासोबत
लग्नाच्या पंगतीतही बसण्याची आपली औकात
नसती,लेखनपंक्तिची बात सोडाच..पण ऊगाच
मुलगा जसा बापाच्या शर्टाला धरुन मागेमागे जात असतो तसचं
मीही पुलं'बाबांचा अंगरखा धरून ,शेंबूड पुसत लिहिण्याचा पोटभर
प्रयत्न करेन.. पुलंचा उपवासाचा अन
माझ्या उपवासाचा 'विषय' जरी एक असला तरी 'आशय'
कुठेतरी वेगळा आहे,हे यथावकाश कळेलच आपल्याला....!!
''अहो..ऊठायचं नाही का आज,?आठ वाजून गेलेत..''
बायकोचा खणखणीत चिल्लर सांडल्यासारखा आवाज
आला अन मी दचकून पलंगावर ऊठून बसलो..'मी नाही..मी नाही''
बरळता बरळता बायको म्हणाली,'काहो?स्वप्नात माझ्या लपून
कुठले ऊद्योग चालू होते??'
तीच्या डोळ्यातला 'चटका'लागल्यावर पूर्ण शुध्दीवर
आलो..''अगं ,काही नाही,असचं आपलं..'' अन कसंनुस हसतं
उत्तरलो..'अहो,कलेक्टर ने आषाढी ऎकादशी ची सुटी 'डिक्लेर'
केली ते नुसत झोपायला का??मी हे विचारत होते की,आज
ऎकादशीचा उपवास करणार की,तुमच्यासाठी कुकर लावू??
बायकोला उत्तर देणार इतक्यात रोजच्या वरण
भाताच्या दुसर्या तागड्यात
मला साबुदाणा पोहे,चिप्स,बटाटे,रताळ्याचा खरपूस तूंप
टाकलेला शिरा,राजगुरा,दाण्याचे लाडू ई.ई.भरलेले आढळले,अन
साहजिकच फराळी यादीचं पारडं जड
झालं..मी मोठ्या भक्तीभावानं म्हणालो,''अगं
वेडे..अवघा महाराष्ट्र,अर्धा कर्णाटक अन अर्धा आन्ध्र
ज्या विठ्ठलाला भजतो,त्याचे आजच्या दिवशी गुणगाण
करतो,त्याच्यासाठी उपवास करतो,त्या 'सावळ्यासाठी' मी एक
दिवस उपवास केला तर बिघडलं काय??
बायकोला बहुदा माझ्या तोंडात जमा झालेली 'लाळ'
ऎव्हाना कळली होती..'बरं..बरं..'' असं म्हणून ती किचनकडे
वळाली..
मी घाईने ऊठलो,बाथरुम मधुन ब्रश व पेस्ट घेऊन 'पाकशाळेत'
गेलो..गॅसवर तेल पिऊन कढई बसलेली दिसली,हायसं
वाटलं..ब्रशवर पेस्ट घेतो न घेतो तोच झुरळ पाहिल्यासारखं
बायको किंचाळली,''ई...शि बाई..तो ब्रश आणि पेस्ट
ठेवा आधी..'' मला कळेचना,''अगं..काय झाल?
उपवासाच्या दिवशी भटजीबुवांनी दात
घासायची बंदी सांगितली का''? ''अहो..मी टिव्ही वर
बघितलयं,ब्रशचे केस प्राण्याचे असतात म्हणे,अन
पेस्टमध्येही हाडांचा चुरा मिक्स असतो''बायको दमात
ऊत्तरली...मला बायकोच्या तर्कशास्त्राचा हेवा वाटला..मी
म्हणालो..'वेडे..ते रंगवायचे ब्रश असतात,आणि पेस्टमध्ये काय
टाकतात हे बघणारी तू काय,'क्वालिटी कन्ट्रोल मॅनेजर' आहेस
का?? 'ते मला,कळतं नाही,तेलाल दंत मंजन आहे,आज त्याने
दात घासा'' तीने निर्णय जाहिर केला..'मग
यातही विटांचा चुरा असतो म्हणे'' मी खोचक
बोललो..''असेना का,विटा शाकाहारी आहे,अन तसही आज
'विटेचाच' मान आहे,घ्या मुकाट्याने''..आज दिवसभर
तीला किचनमध्ये त्रास द्यायचा असल्याने मी निमूटपणे
हा त्रास सहन करत होतो...
शुचिर्भूत होवून बातम्या घेत
असतांना,बायको आली..'अहो,निदान आज तरी थोडा 'हरीपाठ'
वाचावा माणसाने,सकाळी सकाळी''..मला झिणझिण्या आल्या,''अगं
बाई..मी काल रात्रीपासून काही खाल्लेल
नाही,उपासीपोटी कुठलही युद्ध जिंकता येत नाही,अन
देवालाही ते आवडतं
नाही..जा थोडासा बदामशिरा कर,मोठी प्लेटभरून..बाकी नंतर
सांगेन..'' माझा रवैय्या पाहून बायको,हळूच कानात
पुटपुटली...''आपलं पोट बघितलं का??
त्या कोपर्यावरच्या 'नटमोगरी' सारखं दिसते आहे,अन म्हणे
युद्ध,अन उपाशी'' तशी ती तनतनत किचनमध्ये गेली.. म्हणजे
एक गोष्ट मला कळाली होती..'नटमोगरी'ला दिवस
गेलेत..माझ्या पोटावरून हात फिरवत मी अंदाज बांधला..म्हणजॆ
तिसरा महिना..तरिच म्हटलं..अशात जरा नटमोगरी 'बेढब'
कशी दिसतेय.. ..:-)  :क्रमश:

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537

हे रोजचे तुझे बघ.. (गझल)

| |

हे रोजचे तुझे बघ,लटके रुसून जाणे..,
पाणावल्यावरी मी,हलके हसून जाणे..!!

तू चाळतेस माझे,पंचांग रोज सखये..,
आता तरी जमूदे,शुक्राचे फसून जाणे..!!

होतात का असे हे,आभास पावलांचे..,
आवाज पैंजनांचे,कानी ठसून जाणे..!!

आहे फितूर येथे,जन्मास लाभलेले..,
त्यांचे छळून जाते,सोबत बसून जाणे..!!

वक्तृत्व दूर आहे,माझ्यामधून मित्रा..,
तरिही सभेस कळते,माझे असून जाणे..!!

सरकार तेच टिकते,ज्यांना जमून येते..,
तोंडास ह्या प्रजेच्या,पाने पुसून जाणे..!!

मोहास टाळणेही,घ्यावे शिकून आता..,
वाटेवरी श्रमाच्या,कंबर कसून जाणे..!!

सोडून दूर गेली,माझीच सावली मज..,
अंधार याद देतो,तुझिये नसून जाणे..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर...

दार नाही लावले..(गझल)

| |

परत जातांना सुखाने,दार नाही लावले..,
हेरले तितकेच आणिक,त्या दुखाचे फावले..!!

मोह झाला कांचनाचा,कैकदा मज जीवनी..,
त्याचवेळी झोपडीने,ते 'कवडसे' दावले..!!

फाटक्या पदरास माझ्या,ह्या फुलांनी टाळले..,
वाट माझी पाहणारे,तेच काटे भावले..!!

रोजची ती देवपूजा,आज झाली सार्थकी..,
दूर करण्या दुःख माझे,'यम' मला हे पावले..!!

तू म्हणाली चांदणे दे,सिद्ध करण्या प्रेम हे..,
पाहता अंधार घरचा,मन उगाचच कावले..!!

सोडतांना गाव माझे,तू न मागे पाहले..,
श्रावणास पुरेल इतके,थेंब नयनी मावले..!!

लोप झाला संस्कृतीचा,देव झाला खेळणे..,
सोडले किर्तन बुवांनी,नर्तनाला धावले..!!

आम जनता पायपुसणे,राज्यकर्त्यांच्या घरी..,
लोकशाहीला कसे या,ढेकणांनी चावले..??

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

बर्याचवेळा.. (गझल)

| |

भरल्या घरात रडणे,असते बर्याचवेळा..
भिंतीस दुःख हळवे,छळते बर्याचवेळा..!!

देठास हात लावू,कैसा तुझ्या फुला रे..?
नाते असेच अपुले,तुटते बर्याचवेळा..!!

ओठावरी जरासी,हलकेच शीळ येेता..;
मैना घरातली मग,खुलते बर्याचवेळा..!!

व्यापार पाहुनी हा,प्रेमात मांडलेला..;
काळीज फार सुर्या,जळते बर्याचवेळा..!!

त्रिज्या,परिघ वगैरे,असुदेत जिंदगीला..;
छेदून व्यास काही,निघते बर्याचवेळा..!!

खेळी कितीक वेड्या,करशील ईश्वराशी,,;
त्याला मनातले बघ,कळते बर्याचवेळा..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

मी ऎवढा खास नाही.. ( कविता)

| |

मी एवढा खास नाही..
कोवळा मधुमास नाही..
चंदनापेक्षा ही झिजलो..,
पण मला सुवास नाही.. !!

प्राक्तनातच हाल होते..,
फक्त भिजले गाल होते..
शोधता अस्तित्व माझे..,
तेही फक्त कंगाल होते..!!

फाटली स्वप्ने जराशी..
बाळगू किती ऊराशी..
वेदनेचे चांदणे का..,
हाक देई,ह्याच दारी?

फार झाला खेळ सारा..,
यातनांचा हा शहारा..
हे विधात्या,एकदा दे..
ताठ होण्याचा इशारा..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537